Sunday, February 05, 2006

बोलगाणी

पाडगावकरांची "बोलगाणी" आपल्या सगळ्यांचीच खूप लाडकी. या नावातच इतका निरागस आनंद भरून आहे, तो प्रत्येक गाण्यातून आपल्या बरोबर गुणगुणत राहतो!

"बोलगाणी" म्हणता क्षणी "प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं", किंवा "शीळ घालत माणसं" किंवा "सांगा कसं जगायचं" ही गाणी आपल्या पटकन ओठावर येतात. आणि त्या गाण्यांचं अगदी रंगून जाऊन वाचन करणारी पाडगावकरांची प्रसन्न हसरी मूर्ती डोळ्यांसमोर येते!

त्यातलीच काही "वेडी" "चिमणी" बोलगाणी ...

भास
खिडकीतून चांदणं आत येत नाही,
तो नुसताच भास असतो!
खरं तर चांदण्यासारखा भासणारा
तो तुझा भारावलेला श्वास असतो!

खरं गाणं
पाखरांना ठाउक असतं,
बाजारात गळा विकून
आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही!
सोन्याच्या पिंजर्‍याला पंख विकून
आभाळाच्या जवळ जाता येत नाही.

गूढ
मला सांग,
फुलपाखरु तुझ्याकडेच कसं वळलं?
फांदी सगळी रिकामी असूनही
फुलं येणार हे तुला कसं कळलं?

श्रेय
कधी कधी सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं!
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!

3 comments:

shashank said...

'भास' आवडला.

Fleiger said...
This comment has been removed by a blog administrator.
Fleiger said...

मी अमेय. ओळखीच्या कोणाचातरी blog वाचयला बरे वाटते. marathiblogs.net वरून हा address मिळाला. :)