Monday, February 20, 2006

तू भ्रमत आहासी वाया

काही दिवसांपूर्वी वपुंचे "तू भ्रमत आहासी वाया" वाचले. प्रांजळपणे सांगते, पहिल्या वाचनात सगळे झेपले नाही. "कळले" नाही असे म्हणत नाही, पण खूप "जड" वाटले. मग थोडया दिवसांनी पुन्हा वाचले. खूप आवडून गेले. आपल्या सगळ्यांना रोजच्या आयुष्यात कधी ना कधी आव्हान देणारे, कधी ना कधी हुलकावणी देणारे, कधी ना कधी वेडावून जाणारे तत्त्वज्ञान एका छोटया कथाधाग्याच्या आधाराने अगदी सहज उलगडत नेले आहे. पाना-पानावरची ओळ न् ओळ आपल्याला विचार करायला भाग पाडते. सगळंच काही आपल्याला पटतं असंही नाही, पण थबकून विचार करायला लावतं. आपले अनुभव त्याच्याशी पडताळून पहायला लावतं. प्रश्न विचारायला भाग पाडतं.

"शरण आल्यानं फरक पडत नाही. रियलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक. क्षमा मागणं, चूक कबुल करणं हा बहाणा असतो. पुन: पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो, कारण वाकावं लागलं ह्याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत, हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्यानं पुन: पहिल्यासारखंच वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी विचार करावा."

No comments: