Monday, November 27, 2006

पर्याय आणि निवडस्वातंत्र्य

ऑफिसच्या कॅंटीनच्या मेनूसमोर उभं राहून माझी एक सहकारी तक्रारीच्या सुरात म्हणाली, "हे काय, काही सुद्धा खावंसं वाटत नाही, याला हे लोक भरगच्च मेनू म्हणतात? काही choiceच नाही!" मेनूवर साताठ वेगवेगळे "पर्याय" असूनसुद्धा.

पर्याय ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. भरगच्च पर्याय हे पुरेशा निवडस्वातंत्र्याचं निदर्शक आहे का? आपल्याला हवा असलेला नेमका पर्याय त्यात नसेल तर? जेव्हा आपण "सगळ्या पर्यायांचा नीट विचार करून मोकळ्या मनानी निवड करता आली पाहिजे" असं म्हणतो तेव्हा कुठेतरी आपल्याला मनापासून हवा असलेला पर्याय उपलब्ध आहे असं आपण गृहित धरलेलं असतं का? तसं नसेल तर मग कसा घेणार मोकळ्या मनानी निर्णय? कारण दिलेल्या पर्यायांची मर्यादा त्यावर आधीच पडलेली असते.

खर्‍या मोकळ्या मनानी तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुम्हाला स्वत: पर्याय निर्माण करायचं, कमीत कमी धुंडाळायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य हवं. निवडीचं स्वातंत्र्य हे उपलब्ध पर्यायांच्या पलिकडे जायला हवं. किंवा काही बहुपर्यायी प्रश्नांना कसा पाचवा पर्याय असतो न, "वरीलपैकी काहीही नाही", तसा कायम एक पाचवा पर्याय असावा! पण मग "वरीलपैकी काहीही नाही" हा पर्याय बाकीच्या सगळ्या पर्यायांना निरर्थक करतो. शिवाय "वरीलपैकी काहीही" नसलेलं म्हणजे काय हे नक्की माहीत असेल तर तो पाचवा पर्याय निवडण्यात अर्थ आहे न?

"हो ना, काही choiceच नाही" असं म्हणत आमचा घोळका ऑफिससमोरच्या रेस्टॉरंट कडे वळला, हे सांगणे नलगे! संध्याकाळी घरी आले आणि मेघना पेठेंचं "आंधळ्याच्या गायी" समोर दिसलं!

"
घटना घडतात.
पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.
घडायचं ते घडून जातं...
पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले..
तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे...
क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्त्वाचे...
त्यातला एकच निवडता येणार असतो,
आणि निवडावा तर लागणारच असतो!
पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...
माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.
यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही,
अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात
सोडाव्या लागणार्‍या या आंधळ्याच्या गायी...
त्यांना म्हणे देव राखतो...!
आणि आंधळा?
तो तर फक्‍त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो.
"

Sunday, November 05, 2006

चार होत्या पक्षिणी त्या

तुम्हाला असं कधी तरी होतं का? होतच असणार. कुठल्या तरी बेसावध क्षणी कुठल्या तरी निमित्तानं कुठलीतरी जुनी गोष्ट आठवते. कुठलातरी जुना प्रसंग आठवतो. कुठलंतरी जुनं गाणं आठवतं. पण माझ्यासारखी "विस्मरणशक्‍ती" अफाट असेल तर धड पूर्ण आठवत नाही, बारकावे आठवत नाहीत... आणि मग अशी चुटपुट लागून राहते.

आता कालचीच गोष्ट बघा न....

निमित्त काय झालं ते पुन्हा कधीतरी. पण मला सारखी आठवत राहिली "वीज म्हणाली धरतीला" मधली जुलेखा, "चार होत्या पक्षिणी त्या". आणि हे गाणं पूर्ण काही आठवेना. तेव्हापासून जी काही अस्वस्थ झालीये!

तेव्हा या ब्लॉगच्या वाचकांनो (वाचतंय् का हो कोणी?), कोणाकडे असेल हे गाणं पूर्ण, कृपया नोंदा न!